नौजवान भारत सभेकडून 23 मार्च शहीद दिनानिमित्त सदस्यता अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी 16 मार्च रोजी तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू सारख्या क्रांतिकारकांनी केलेली देशाच्या स्वातंत्र्याची व्याख्या मांडली गेली. फक्त ब्रिटिशांना या देशातून घालवणे एवढेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट नव्हते तर एक असा समातमूलक समाज निर्माण करणे, जिथे कुठल्याही प्रकारचे शोषण नसेल, जिथे स्त्री-पुरुष भेद नसतील, जिथे जातीय-धार्मिक भेद नसतील, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या देशात कामगार-कष्टकऱ्यांचे राज्य आले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होऊन गेली आहेत. या 7 दशकांमध्ये फक्त उद्योगपती, बिल्डर आणि काही प्रमाणात 1991 नंतर उदयास आलेला मध्यम वर्ग यांचाच विकास झाला आहे. आज एकीकडे वरच्या 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे तर दुसरीकडे खालच्या 50% कामगार-कष्टकरी जनतेकडे फक्त 3% संपत्ती आहे. आज स्वतंत्र भारतात गरीब-श्रीमंत दरी ही ब्रिटिश काळापेक्षाही जास्त वाढलेली आहे. शिक्षण, आरोग्य, घर, रोजगार यांसारख्या मूलभूत गोष्टींपासून बहुसंख्य कष्टकरी जनता वंचित आहे. या देशातली सगळी संपत्ती कष्टकरी जनता पैदा करते पण त्याच्याच मेहनतीवर या देशातला ऐतखाऊ वर्ग म्हणजे भांडवलदार, ठेकदारांचा वर्ग मोठा होत असतो. म्हणून शहीदांचे समतामूलक समाजाचे स्वप्न आजही अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी या देशातल्या तरुणांवर आहे. नौजवान भारत सभा शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारांवर चालते आणि देशातल्या तरुणांना शिक्षण, रोजगार सोबतच इतर प्रत्येक हक्क अधिकारांसाठी संघटित करण्याचे काम करते. शेवटी चर्चेमध्ये सामील सर्वांना नौभास ची सदस्यता घेण्याचे आवाहन केले गेले.
नौजवान भारत सभे तर्फे अप्पर, बिबवेवाडी, पुणे भागातील तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन
