नौजवान भारत सभा (मुंबई) गेल्या पाच वर्षांपासून शहीद राजगुरू शिक्षण सहाय्यते केंद्र चालवत आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते.
हे केंद्र केवळ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासात मदत करण्यासाठी नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील नौभासच्या शहीद भगतसिंह वाचनालयाच्या आसपास राहणाऱ्या मुलांमध्ये प्रगतीशील विश्वदृष्टिकोन निर्माण करण्याचे देखील काम करते. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत गुण मिळावे ह्या उद्दिष्टाने विषय शिकवले जात नाहीत, तर आपण ज्या जगात राहतो ते समजून घेण्यास आणि त्यांना न्याय्य आणि मानवीय व्यक्ती बनण्यासाठी देखील प्रेरित केले जाते.
नवीन सत्र सुरू करण्यापूर्वी मानखुर्दमधील साठे नगर आणि लल्लूभाई कंपाउंडमधील कामगार वर्गीय वस्तीत नोंदणी अभियान चालवण्यात आले. अनेक ठिकाणी नोंदणी डेस्क लावण्यात आले तसेच घरोघरी जाऊन शिक्षण सहाय्यता केंद्राबाबत सांगण्यात आले. यादरम्यान नौजवान भारत सभेचे उद्दिष्ट सांगणारी पत्रके वाटण्यात आलीत. ह्या संपूर्ण अभियानाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी हे अभियान सुरू ठेवले जाईल.
आज खाजगी कोचिंग संस्थांचे मोठे जाळे देशभरात पसरले आहे. शिक्षणाला वाढत्या प्रमाणात एक क्रयवस्तू म्हणून पाहिले जात आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण शिक्षण सोडण्यास मजबूर आहेत कारण त्यांना या संस्थांकडून आकारले जाणारी भरमसाठ फी परवडत नाही. हा उपक्रम ‘सर्वांसाठी निःशुल्क आणि समान शिक्षण’ हा मूलभूत अधिकार बनवण्याच्या आमच्या दीर्घकालीन संघर्षाचा फक्त एक भाग आहे.
