कार्यक्रमाची सुरवात साथी सुस्मितने शहीदांच्या अभिवादनाने केली. भगतसिंह आणि त्यांचे साथीदार ज्या इंकलाबचे स्वप्न पाहत होते ते स्वप्न आजही अपूर्ण आहे. आजच्या तरुणांना शहीदांपासून प्रेरणा घेत आजच्या समाजातील अंधकारमय वातावरणात निराश होऊन न जाता तरुणांमध्ये, कामगार कष्टकऱ्यांमध्ये क्रांतीची चेतना पेटवली पाहिजे. आपल्या संकल्पांमध्ये शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार आजही जिवंत आहेत आणि आपल्या पुढच्या वाटचालीत नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील. साथी भीमाने वस्तीतल्या तरुणांची भीषण परिस्थिती मांडली. कामगार कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नसल्याने आजचा तरुण व्यसन, गुंडगिरी आणि आत्महत्यांना बळी पडत आहे. तरुणांच्या भविष्यात अंधाराशिवाय काहीच उरलेले नाही. ह्याच परिस्थितीचा फायदा भांडवली पक्ष व स्थानिक शासकवर्ग घेतात आणि तरुणांचा फक्त वापर करून घेतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठीच तरुणांनी पुढे आले पाहिजे. यानंतर साथी नेहाने नौजवान भारत सभेची ओळख मांडत सांगितले की नौजवान भारत सभा ही तरुणांची संघटना असून शहीद भगतसिंहच्या विचारांवर चालणारी संघटना आहे, त्यांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारी संघटना आहे. यानंतर तिने नौजवान भारत सभेच्या कार्यक्रमाची थोडक्यात मांडणी केली. कार्यक्रमाची सांगता भगतसिंहाचे “कौम के नाम सन्देश” हा लेख वाचून त्यावर चर्चा करून करण्यात आली.
शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला 22 मार्च रोजी पुण्याच्या सुपर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंह वाचनालयाचे तसेच शिक्षण सहायता केंद्राची सुरवात करण्यात आली.
