28 ऑगस्टला अय्यंकाली जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा तर्फे अभियान करण्यात आले. अय्यंकाली जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी ब्राह्मणवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर त्यांना विश्वास होता. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालीना आज आठवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जातिअंताची चळवळ सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या दलदलीत फसली आहे.
अय्यंकालींनी सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याची विद्रोही कृती असो, दलीत मुलांना शाळेत प्रवेशाच्या अधिकारासाठी लढाई असो, शेतमजूर कामगारांचा संप घडवून आणणे असो यातून अय्यंकालींची कार्यदिशा अगदी स्पष्ट होते. अय्यंकाली एक क्रांतिकारक होते ज्यांना जनतेच्या शक्ती आणि पुढाकारावर भरवसा होता, सरकार पेक्षा जनतेच्या मूलगामी संघर्षावर विश्वास होता. त्यांनी जातीअंताच्या प्रश्नाला कामगारवर्गीय एकतेची जोड दिली.
आज अय्यंकालींच्या क्रांतिकारी वारशासोबत स्वतः ला परिचित करून घेणे महत्वाचे बनले आहे. अय्यंकाली सत्तेसोबत संघर्ष करणारे नेते होते त्यामुळे आजच्या राज्यसत्तेने त्यांना आठवण्याचे काहीच कारण नाही. यामुळेच क्रांतिकारी आणि प्रगतीशील शक्तींची ही जबाबदारी बनते की त्यांनी अय्यंकालींना, त्यांच्या कार्याला जनतेमध्ये घेऊन जावे. यातून जातिअंताच्या चळवळीला योग्य दिशा मिळेल आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात अखेरचा लढा उभा करता येईल.
