२३ ते २७ मे दरम्यान विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचे आयोजन शहरातील महाराष्ट्र बालक मंदिर,अहमदनगर येथे करण्यात आले होते.मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट म्हणजे १२५ विद्यार्थी इतकी होती.सरासरी १०० विद्यार्थी संपूर्ण शिबिरा दरम्यान हजर राहिले. शिबिराच्या पहिल्या दिवशी चित्रकला विषयाबाबत प्रमोद तापकिरे यांनी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनीही स्वतःची कल्पकता वापरून सुंदर चित्रे रेखाटली. दुसर्या दिवशी शाडू माती पासून शिल्प बनवण्याच्या उपक्रमात विषयी विकास कांबळे यांच्या सहवासात विद्यार्थ्यांनी बनवलेली शिल्पे आश्चर्यचकित करून सोडणारी होती. तिसरा दिवस सहलीच्या धम्माल मज्जेचा होता. साईबन-कृषी पर्यटन केंद्रामध्ये ही सहल नेण्यात आली होती, जिथे बोटिंग पासून रैन डान्सचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. चौथ्या दिवशी वैज्ञानिक सिद्धांतांची उकल करण्यासाठी व रोजच्या जगण्यातील विज्ञान समजून घेण्यासाठी प्रयोग दाखवले गेले. चारही दिवसात नौभास ची टीम विद्यार्थ्यांशी संवाद साधत होती, छोट्या छोट्या भाषणातून वैज्ञानिक तर्क बुद्धीचा अंगीकार, अंधश्रद्धा विरोध,जात-पात विरोध,सामुहीकता,वाचन-लेखन-अभ्यास इ.विषय समजून सांगितले गेले. ‘भगतसिंगाचे स्वप्न अधुरे कोण करतील पुरे…आम्ही सारे ..आम्ही सारे’ ‘जातीपातीचा रोग विषारी या रोगावर हल्ला जारी’ ‘विज्ञानाची कास धरू ,अंधश्रद्धा दूर सारू’ ‘पुस्तकं वाचा ज्ञान वेचा’ इ.घोषणा या पाच दिवसाच्या काळात विद्यार्थ्यांच्या प्रिय घोषणा बनल्या होत्या.समारोपाचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला,या कार्यक्रमाला पालकांनी व रहिवासी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या दिवशी झालेल्या विविध गुण-दर्शनाची सुरुवात आकाश कांबळेनी तयार केलेल्या कराटेच्या प्रात्यक्षिकाने करण्यात आली होती ,ज्यात शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी भागीदारी केली होती,डान्स,गाणी व आजच्या शिक्षण व्यवस्थेवर एक नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.संधी व योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले काय कमाल करू शकतात याचा प्रत्यवाय या कार्यक्रमाच्या दरम्यान क्षणोक्षणी येत होता.पालकानाही आपल्या मूल्यांच्या अनेक गुणांचा आविष्कार प्रथमच अनुभवायला मिळत होता,त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य मिश्रित आनंद लपत नव्हता.आज जेव्हा भोवतालच वातावरण परधर्मद्वेषी-धर्मांध,तर्क बुद्धीची कत्तल करनार,भांडवली गळेकापू स्पर्धेने बरबटलेले,रोगट,आत्मकेंद्री-कुपमंडूक स्वार्थपोषी आहे.आणि शिक्षण देणे हा फक्त धंदा बनला असताना या वातावरणात जन्मलेली व वाढणारी पिढी वैफल्यग्रस्त,रुग्ण मानसिकतेची बनू नये यासाठी व एका शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीच्या भगतसिंहाच्या अधुर्या स्वप्नाला प्रत्येकाचे स्वप्न बनवून साकारण्यासाठी असे शिबिरे प्रासंगिक व अगत्याची आहेत.
नौभास आयोजित पाच दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची सांगता.
